कळंब (प्रतिनिधी)-येथील पीएमश्री नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. 2 कळंब मध्ये विद्यार्थी-पालक, शिक्षक संवाद मेळावा विविध शालेय उपक्रमांसह साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी 'गुढी पाडवा, प्रवेश वाढवा' या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून 'प्रवेश दिंडी' आयोजित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वेगवेगळ्या रंगीबेरंगी पोषाखातील प्रवेश दिंडी लक्षणीय होती.यानंतर इयत्ता पहिली वर्गात प्रवेशित झालेल्या नवागतांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच सर्व नवागतांचे औक्षण शाळेतील सर्व शिक्षकांनी करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला सदिच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व अतिथी आणि पालकांच्या समोर शाळेतील विद्यार्थ्यांनी चावडी वाचनाचा उपक्रम राबविला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी मजकुराचे वाचन करून दाखवले. 

सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कळंब नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मा. मंजुषा गुरमे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांसमोर बोलताना त्या म्हणाल्या की, आजही जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सरकारी शाळेत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. सध्या कार्यरत असणाऱ्या बहुतांशी अधिकाऱ्यांचे शिक्षण जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या प्राथमिक शाळांमधून झालेले आहे. त्यामुळे पालकांनी साशंक न होता मराठी माध्यमाच्या सरकारी शाळेत आपल्या पाल्याना प्रवेशित करावे. यावेळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक  लक्ष्मीकांत वाघमारे, माजी नगर सेवक पत्रकार  सतीश टोणगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. मुनिरोद्दीन शेख, सदस्य अनिता कांबळे, पूजा हौसलमल, वनिता लोळगे, मारुती माने, विनोद कोकाटे, बालाजी क्षीरसागर, कृष्णा पायगिरे, महेश मुंडे, संजय कांबळे, सुलभा कसपटे, दैवशाला चव्हाण, अश्विनी भराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा. मुकुंद नांगरे यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहशिक्षक विशाल वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश चव्हाण, अमोल चव्हाण, विनोद राऊत, गीताश्री नागटिळक, सोनाली पाटील, सयाराणी कऱ्हाड या शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.

 
Top