धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यासह देशभरात वाढत असलेल्या मेफेड्रोन आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा आज लोकसभेत गाजला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबालकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात अतारांकीत प्रश्न क्रमांक 3944 व्दारे केंद्र सरकारकडे या संदर्भात प्रश्न विचारणा केली होती.

गृहमंत्रालयाने दिलेल्या लेखी उत्तरानुसार, सरकारने अमली पदार्थांच्या तस्करीबाबत माहिती घेतली असून, राष्ट्रीय गुन्हे नोंद आयोगाच्या आकडेवारीनुसार 2020 ते 2022 या कालावधीत महाराष्ट्रात एनडीपीएस कायद्यांतर्गत मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद झाले आहेत. तथापि, विभागवार आकडेवारी नोंदवली जात नाही. धाराशिव जिल्ह्यातील तस्करी प्रकरणा संदर्भात सरकारच्या उत्तरानुसार, अशा प्रकरणांची चौकशी संबंधित राज्यांच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून केली जाते. तसेच, एखाद्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवायची की नाही, हे राज्य सरकार आणि न्यायालयांच्या अधिकारात येते. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण सीबीआयकडे जाईल का, याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

केंद्र सरकारने स्पष्ट केले की, अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात. नार्को समन्वय केंद्र प्रणाली, राष्ट्रीय अँटी नार्को टास्क फोर्स आणि विविध बैठकींद्वारे केंद्र सरकार राज्यांना सतत मार्गदर्शन करत असते. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी भागात अमली पदार्थांची तस्करी झाल्याची ठोस माहिती स्वापक नियंत्रण ब्युरोकडे उपलब्ध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. तथापि, अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय यंत्रणांचे समन्वय वाढवण्यात येत आहे. केंद्र सरकारने ही समस्या गांभीर्याने घेतली असून, अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

 
Top