धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना जिल्ह्यातच एक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुढाकार घेतला आहे.आता लवकरच जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादित वस्तू व साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील आठही तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची बैठक घेण्यात आली.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विलास जाधव व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुजार यावेळी म्हणाले की,बचतगटांच्या महिला ह्या दर्जेदार उत्पादन करतात.मात्र त्यांच्या उत्पादित वस्तू व साहित्याची विक्री ही केवळ मेळावे व कार्यक्रमाच्या माध्यमातून लावण्यात येणाऱ्या स्टॉलवरूनच करण्यात येते.मात्र स्वस्त धान्य दुकानातून त्यांच्या वस्तूला वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे त्यांच्या वस्तू व साहित्याची विक्री स्वस्त धान्य दुकानातून होणार असल्यामुळे आणखी वस्तू व साहित्य निर्मिती करण्यास बचतगटांना प्रोत्साहन मिळेल.बचत गटांच्या उत्पादित वस्तूंवर ग्राहकांचा विश्वास असल्यामुळे त्यांच्या वस्तू व साहित्याची विक्री स्वस्त धान्य दुकानातून मोठ्या प्रमाणात विक्री होण्यास मदत होईल.स्वस्त धान्य दुकानदारांना सुद्धा त्यांचे कमिशन बचत गट देणार आहे.यावेळी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार संघटनांच्या प्रतिनिधींनी सुद्धा बचत गटांच्या वस्तू व साहित्याची विक्री करण्यास चांगला प्रतिसाद दिला,त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादित वस्तू स्वस्त धान्य दुकानातून मिळण्यास मदत होणार आहे.चांगला उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.