धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशीव जिल्ह्यात एप्रिल व मे 2024 मध्ये अवेळी पाऊस तर सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून 226.87 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 1 लाख 6 हजार 587 शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 137.77 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
उर्वरित 89.09 कोटी रुपये शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर सादर केली नसल्यामुळे आणि ईकेवायसी पूर्ण न झाल्याने वितरित होणे बाकी आहे. त्यामुळे बाधित शेतकरी बांधवांनी तात्काळ ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि आपल्या हक्काची नुकसान भरपाई पदरात पाडून घ्यावी. असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्या पोर्टलवर आतापर्यंत पात्र ठरलेल्या 1 लाख 83 हजार 623 शेतकऱ्यांपैकी 1 लाख 51 हजार 650 शेतकऱ्यांची माहिती अपलोड झालेली आहे. अपलोड करण्यात आलेल्या माहितीपैकी आजअखेर 16 हजार 463 शेतकरी बांधवांचे ई केवायसी होणे बाकी आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या एकूण 226 कोटी 87 लाख रुपयांपैकी वितरण झालेले 137.77 कोटी रुपये वगळता आणखी 89.09 कोटी रुपये वितरित होणे बाकी आहे. पात्र असलेल्या आणि अद्याप पोर्टलवर माहिती न भरलेल्या तसेच ज्यांची ई केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.