उमरगा (प्रतिनिधी)- संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चोखोबा ते तुकोबा' या समता वारीचे आगमन शुक्रवारी (दि.तीन) शहरात झाले. संत साहित्यिक मधुकर गुरव, सामाजिक कार्यकर्ते अनिल उर्फ पप्पू सगर यांच्या हस्ते संत चोखोबा यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. वारीचा प्रारंभ बुधवारी (दि. एक) श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून झाला आहे. भागवत धर्म - वारकरी संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
‘चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची 2025 'चे यंदाचे 7 वे वर्ष आहे. ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, माकणी, औसा तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम-पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, पैठण, जालना, सिंदखेडराजा, मेहुणाराजा, देउळगांवराजा, संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे जाणार आहे. वारी राज्यातील नऊ जिल्ह्यातून 1750 किलोमीटर प्रवास करणार आहे. संतांनी सांगितलेल्या समता, बंधूता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येत आहे. विशेष सजविलेल्या वाहनात संत चोखोबांची उत्सवमूर्ती सर्वांचे लक्ष वेधते आहे. शाळा, महाविद्यालय, वाड्या-वस्ती, गाव, शहर या ठिकाणी जाऊन वारी दरम्यान प्रबोधन करीत आहे. माणसा माणसातील वाढत चाललेली दरी कमी होऊन समाजात बंधूभाव वाढीस लागावा, समाजातील जातीय-धार्मिक विद्वेषी दरी कमी होऊन आपापसात बंधूभाव वाढावा यासाठी तसेच समता, मानवता व बंधूभावाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यत पोहचवण्यासाठी समता वारीचा उद्देश असल्याचे समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी सांगितले. रविवार पर्यंत ही वारी धाराशिव जिल्ह्यातून प्रबोधन प्रवास करणार आहे. समता वारी निमंत्रक सचिन पाटील , महादेव ढेंबरे, प्रा. विनोद सूर्यवंशी, राजेंद्र नेमाने,पांडुरंग काळेल, मल्हारराव पिंपळे- पाटील, अजय शिंदे, ॲड. रोहित मुंडे आदी समता वारी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.