उमरगा (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचे कामे अर्धवट आहेत. शहरातील बायपास रोड मृत्यूचा सापळा ठरत आहे. त्यामुळे बायपास रोडवरील सर्विस रोडचे काम तात्काळ व्हावे व शेतकऱ्यांसाठी दोन ठिकाणी बोगदा तयार करण्यात यावा. या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी दीड तास ठिय्या आंदोलन केले.       

राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव वाडी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. या रस्त्यावर पाहणी केल्यानंतर या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला. याबाबत आमदार प्रवीण स्वामी यांनी राष्ट्रीय महामार्गावर वरिष्ठ अधिकाऱ्याशी  दूरध्वनीवर याबाबत चर्चा केली व पूर्वकल्पना दिली. मात्र शेतकरी रास्ता रोको आंदोलन करण्यावर ठाम होते. त्यामुळे उमरगा शहराचा बायपास रोड हा मृत्यूचा सापळा ठरत असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केले.      

हे ठिय्या आंदोलन व रास्ता रोको झाल्याने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी या ठिकाणी येऊन शेतकऱ्याशी चर्चा केली, लेखी निवेदन घेतले व याबाबत वरिष्ठाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, डॉ अजिंक्य पाटील,रज्जाक अत्तार, सिद्रामाप्पा चिंचोळे, विजयकुमार नागणे, रणधीर पवार,अशोक सांगवे,महावीर कोराळे,राजेंद्र सूर्यवंशी, सन्नी पाटील,वैजनाथ काळे,विजयकुमार तळभोगे ,सुधाकर पाटील, दत्ता शिंदे, व्यंकट शिंदे,अमोल शिंदे, बालाजी मिरकले, अशोक मिरकले, आदी शेतकरी व शिवसेना पदाधिकारी यांच्यासह  राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी श्याम बिराजदार ,सुभाष शामल, सुभाष गंभोरे, नायब तहसीलदार काजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे उपस्थित होते.          


अन्यथा टोलवसुली बंद

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने याबाबत 28 जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असून यातही जलद गतीने कामे नाही झाल्यास लोकहितासाठी टोल नाके ही बंद पाडू असा इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी यावेळी दिला.

 
Top