नळदुर्ग (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पातील 55 वर्ष जुन्या पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी हिवाळी अधिवेशनात 13 कोटी 97 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दुरूस्तीअभावी मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी वितरण होत नसल्याने साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेकतकऱ्यांची शेती या पाण्यामुळे नापीक बनली होती. ती आता पून्हा 55 वर्षानंतर शेतकऱ्यांना कसाययला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून या मुख्य कालव्याची दुरुस्ती होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. वितरण व्यवस्थेत सुधारणा, अस्तरीकरण आणि बांधकाम दुरूस्तीसाठी 29 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 13 कोटी 97 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता 10 गावांतील तीन हजार 643 हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे.

नळदुर्गच्या बोरी धरणाच्या कालव्याला 55 वर्ष पूर्ण होत आहेत. हा कालवा मातीचा भराव भरुन केला असल्याने या कालव्याला गेल्या 50 वर्षापासून गळती सुरु आहे. कालव्यातील पूर्ण पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमीनीला मिळत नसे. 50 टक्के पाणी हे गळतीमुळे वाया जात असे. आज पर्यंत या बाबीकडे कोणीच पाहीले नव्हते. मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या बाबीकडे लक्ष घालून नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये कालव्याच्या दुरुस्तीसाठी, अस्तीरीकरण करण्यासाठी सुमारे 29 कोटी रुपयेचा निधी मंजूर करुन घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. 

कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांना शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जाते. दहा गावांतील तीन हजार 643 हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे.


मात्र प्रकल्पाची वितरण व्यवस्था 55 वर्षे जुनी आहे. आजवर कालव्याचा झालेला वापर, कालव्याची वेळेवर न झालेली दुरूस्ती, अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा विसर्ग 50 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. कालवा भरावातून, बांधकामातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. सिंचन अवर्तनाचा कालावधीतही त्यामुळे वाढ झाल्याने सिंचन क्षेत्रात मोठी घट झाल्याचे तसेच अनेक ठिकाणी शेवटच्या टोकाला कालवा बुजविला गेल्याचेही निदर्शनास आले आहे.

दरम्यान या 50 वर्षामध्ये या मुख्य कालव्याच्या गळतीमुळे कालव्याच्या बाजूने असलेल्या नळदुर्ग, पाटील तांडा, अणदुर आदी भागातील शेतकऱ्यांच्या जमीनी मध्ये कायमस्वरुपी पाणी साठत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनी नापीक झाल्या होत्या. त्यामुळे गळतीमुळे पाटलांच तळ, परटांच तळ असे शिवारामध्ये त्या जमीनीमध्ये साठत असलेल्या पाण्यामुळे नावे ही पडली आहेत, आणि आजवर शेतकरी या नावानेच या शेताला ओळखतात. अशा परिस्थीती मध्ये या तीन्ही शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमीनी नापीक बनल्यामुळे आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शिवाय नापीक झालेल्या जमीनी पून्हा शेतकऱ्यांना कसायला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. शिवाय निधी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांतून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वागतही करण्यात येत आहे.

 
Top