तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार, दि. 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग 65 वर नळदुर्ग बसस्थानकाशेजारी शहापूर रोड येथे गांधीगिरी पद्धतीने केळी व गाजरे वाटप आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी व नळदुर्ग पोलीस ठाण्यास देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, सध्या परिसरातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरु आहे. परंतु शासनाकडून उसाचा दर निश्चित केलेलं नसताना देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस सदरील कारखाने गाळपासाठी नेत आहेत. ऊस उत्पादनासाठी येणारा खर्च लक्षात घेता शासनाने किमान 3700 रुपये प्रतिटन दर भाव घोषित करून सर्व कारखानदारांना आदेशित करण्यात यावे. सोयाबीन संदर्भात केंद्र व राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र उशिरा सुरू करण्यात आल्याने उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी दसरा सणासाठी इतर कर्ज फेडण्यासाठी व दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी व्यापारामध्ये अतिशय कमी भावात विक्री केली आहे. शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. सोयाबीन मधील आर्द्रता शासनाच्या नियमाप्रमाणे 12% किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सदरील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केंद्रावर नाकारले गेले आहे. सदरील बाब लक्षात आल्यावर केंद्रीय शेतकरी कल्याण मंडळांनी आर्द्रतेचे प्रमाण 15% पर्यंत ग्राह्य धरून 15 नोव्हेंबर 2024 रोजी परिपत्रक काढले. मात्र त्या परिपत्रकाचे कोणत्याही खरेदी केंद्राने पालन केलेले नाही. अनेक शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये हमाली व चाळणी या नावाखाली प्रति क्विंटल 100 ते 150 रुपये बेकायदेशीरपणे वसूल केले जात आहे. सदर अन्यायकारक खरेदी पद्धत बंद करून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुटसुटीत व सोपी पद्धत करण्यात यावी. शासनाच्या अतिवृष्टी व दुष्काळ बाबतचे जे जुने निकष लावले जातात. जुन्या निकषामुळे दुष्काळ व अतिवृष्टीबाबत शेतकऱ्यांना विविध योजनेद्वारे मिळणारे फायदे शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे जुने निकष रद्द करण्यात यावे. महाराष्ट्रात 2023 सालच्या दुष्काळामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील नऊ महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली व शासनाने सवलती लागू केल्या. त्याच्या उपाययोजना व अंमलबजावणी काय करण्यात आली याची माहिती लेखी स्वरूपात शेतकरी संघर्ष समिती यांना मिळाली. यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे तुळजापूर तहसीलदार यांनी सर्व संबंधित खात्यांना केलेल्या उपाययोजनाची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे पत्र दिले. तरीसुद्धा कोणत्याही कार्यालयाने माहिती उपलब्ध करून दिली नाही. यानंतर समितीच्या वतीने तहसील कार्यालय तुळजापूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. याला प्रतिसाद देत तहसीलदारांनी 09 सप्टेंबर 2024 रोजी कोणतेही कार्यालय प्रतिसाद देत नसल्याबाबत बाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले. सदरील पत्राच्या आधारे योग्य तो प्रतिसाद न देणाऱ्या सर्व कार्यालय प्रमुख व संबंधित कर्मचारी यांची कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
त्याचबरोबर चालू वर्षामध्ये तुळजापूर तालुक्यात दुष्काळ व अतिवृष्टी झाली पण धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुका हा दुष्काळ व अतिवृष्टी झालेला तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाची कोणतीही शासकीय सवलत किंवा नुकसान भरपाई मिळू शकत नाही. तरी तुळजापूर तालुक्याचा दुष्काळ व अतिवृष्टी यादीत समावेश करून सर्व शेतकरी व विद्यार्थी यांच्यावरील अन्याय दूर करण्यात यावा. पीकविमा संदर्भात 25 टक्के अग्रीम विमा रक्कम अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेले नाही तरी तात्काळ वितरित करण्यात यावी व उर्वरित 75 टक्के विमा केंद्र सरकारने 26 एप्रिल 2024 चे जाचक परिपत्रक रद्द करून 75 टक्के विम्याची रक्कम सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात यावी. तसेच सन 2021 2022 व 23 मधील उर्वरित पीक विमा रक्कम न्यायालयात प्रलंबित प्रकरणामुळे वाटप न झालेली पीकविम्याची रक्कम महाराष्ट्र शासनाने वाटप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे कायमस्वरूपी उपाधीक्षक यांची नेमणूक करण्यात यावी. बरेच वर्ष सदरील कार्यालयाचा कारभार प्रभारी अधीक्षक यांच्यावर चालू असल्यामुळे शेतकऱ्यांची मोजणी प्रकरणे अनेक वर्ष प्रलंबित आहेत शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून त्यांची सर्व कामे खोळंबली आहेत. त्यासाठी पूर्ण वेळ उपाधीक्षक यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांच्यासह पंडित पाटील, अजमोद्दीन शेख, महादेव बिराजदार, गुलाब शिंदे, बंडू मोरे, बालाजी ठाकुर, महेश घोडके, तोलू पाटील, दिलीप पाटील, शहानवाज शेख, गणपत सुरवसे, रहमान शेख, पीरपाशा इनामदार व इतरांची स्वाक्षरी आहे.