धाराशिव (प्रतिनिधी) -तुळजाभवानी मंदिर समितीच्या निधीमधून मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात आले आहे. पुरातत्व खात्याच्या निगराणीाखाली मंदिराचा सभामंडप पूर्ण उकलून पुन्हा मजबूत केला जाणार आहे. मंदिरासह आसपासचा भागही आपण मोकळा करून घेत आहोत. मंदिर आणि परिसराचे काम प्रत्यक्ष पुढच्या काही दिवसांत सुरू होणार आहे. कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये यामुळे गुणात्मक वाढ होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ तुळजाभवानीचे भाविक आणि सातारा गादीच्या महाराणी तथा खासदार उदयनराजे महाराज यांच्या सौभाग्यवती दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरू असताना भाविकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता येईल, याकडे विचारपूर्वक लक्ष देण्यात आले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्थाही केली जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर अत्यंत उत्साहामध्ये आणि समाधानाने प्रत्येक भक्त आपल्या घरी जावा, असेही नियोजन आम्ही करीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिराचा कायापालट करण्याच्या अनुषंगाने काही विषय प्रलंबित आहेत. लवकरच हे विषयही मार्गी लागतील. कारण मंत्रिमंडळाने या बाबतीत यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. मंगळवारी तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दाराच्या कामाचा शुभारंभ भाविकांच्या हस्तेच नारळ वाढवून करण्यात आला आहे. यात नव्याने केलेले बांधकाम काढणे, भुयारी मार्ग, यज्ञमंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदिराचे जतन व दुरूस्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर कार्यालयीन प्रशासकीय इमारती, पोलीस चौकी, खुला प्रेक्षा मंच आदी नव्याने केलेेले बांधकाम काढले जाणार आहे. गोमुख तीर्थ, दत्त मदिर, मातंगी मंदिर, कल्लोळ तीर्थ, निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, दीपमाळ, शिवाजी महाद्वार व ओव्हऱ्या, खंडोबा मंदिर, यमाई मंदिराच्या जतन आणि दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशा, आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्राचेही जतन आणि दुरूस्तीचे काम नियोजित आहे. तुकोजीबुवा मठावरील ओव्हऱ्या, आराध्य खोली, दगडी फरशी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुळजाभवानी देवीचे मुख्य प्रवेशद्वार, त्याचबरोबर जिजामाता महाद्वाराची देखील दुरूस्ती आणि जतन केले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितली.