धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील पाणी वितरण व्यवस्था 55 वर्षे जुनी आहे. दुरूस्तीअभावी अनेक ठिकाणी कालव्याला गळती लागली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाण्याचे वितरण होत नाही. परिणामी साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला त्याचा फटका सहन करावा लागत आहे. वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अस्तरीकरण आणि बांधकाम दुरूस्तीसाठी 29 कोटी रूपये मिळाले आहेत. या कामाची निविदाही प्रसिध्द झाली असून 10 गावांतील तीन हजार 643 हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांना शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जाते. दहा गावांतील तीन हजार 643 हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र प्रकल्पाची सध्या अस्तित्वात असलेली ही वितरण व्यवस्था 55 वर्षे जुनी आहे. आजवर झालेला वापर, कालव्याची वेळेवर न झालेली दुरूस्ती, अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा विसर्ग 50 टक्क्यांवर आला आहे. कालवा भरावातून, बांधकामातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याला गळती लागली आहे. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या भागात असलेल्या शेतकऱ्यापर्यंत उपलब्ध असलेले पाणी पोहोचण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. सिंचन अवर्तनाचा कालावधी वाढल्याने सिंचन क्षेत्रातही मोठी घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी शेवटच्या टोकाला कालवा बुजविला गेल्याचे निदर्शनास आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

अस्तरीकरण आणि बांधकामाच्या कामाची निविदा 7 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. मागील 50 वर्षांपासून दुरूस्तीअभावी रखडलेल्या कुरनूर मध्यम प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात होईल आणि या क्षेत्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळेल. असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 
Top