कळंब (प्रतिनिधी)- शहरात अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा कळंब येथील पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी शासनाने 40 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे. पण हे काम अद्याप सुरू न झाल्याने शिवभक्तामध्ये नाराजी आहे. हे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी नगर परिषदेकडे मनोज चोंदे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसातच विधानसभा निवडणुकांचे आचारसंहिता लागू होईल त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच सुशोभी करणाचे काम सुरू करावे. तसेच पूर्वीच्या इस्टिमेट मध्ये इलेक्ट्रिक शिडीचा समावेश नसेल तर तो करण्यात यावा. जेणेकरून छत्रपती शिवरायांच्या जयंती दिवशी व इतर वेळी शिवरायांना अभिषेक करणे पुष्पहार घालने शिवभक्तांना सोयीचे होईल. सध्या जीव धोक्यात घालून शिवभक्त छत्रपती शिवरायांना अभिषेक व पुष्पहार घालत असतात. सुशोभीकरण काम केल्या शिवाय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे रंगकाम देखील करता येत नाही असे नगर परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे. रंग उडाल्यामुळे पुतळ्याची झीज होत आहे. याची संबंधित विभागाच्या प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. 19 फेब्रुवारी 2025 च्या आत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोधिकरण काम पूर्ण व्हावे अशी शिवभक्तांची इच्छा आहे. आसपासच्या तीन जिल्ह्यातून छत्रपती शिवरायांची कळंब येथील जयंती पाहण्यासाठी शिवभक्त येत असतात. त्यामुळे ते काम लवकरात लवकर व दर्जेदार व्हावे ही सर्व शिवभक्तांच्या वतीने विनंती आहे. जर प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या आधी काम न केल्यास प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ॲड. मनोज चोंदे यांनी दिला आहे.