भूम (प्रतिनिधी)-भूम तालुक्यासह शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही रस्त्यांची अवस्था तर शेतरस्त्यासारखी झाली आहे. रस्त्यावरील खङ्ख्यातून वाट काढताना नागरिकांसह वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी खड्डा चुकवताना, तर कधी खड्यात आदळून अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष घालून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या गोलाई चौक ते प्रतीक पेट्रोल पंप या जवळपास एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक, वाहनचालक प्रस्त झाले आहेत. गोलाई चौक ते शासकीय दूध योजना या जवळपास दीड किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते मागील काही महिन्यांपूर्वी झाले आहे. भूमिपूजनानंतर पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम सुरू होऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा होती. रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे. काही अडचणीमुळे काम थांबवण्यात आले आहे.परंतु नागरिकांचे इकडे हाल होत असताना दिसत आहे.
रस्त्याचे काम चालू असताना काही अडचणीमुळे काम थांबवण्यात आले होते. परंतु इलेक्ट्रिकल पोल काढल्यानंतर दोन ते तीन दिवसात रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात येईल असे सांगितले.
स्थापित अभियंता बाबासाहेब खुणे