धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या 7 मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाप्रसंगी ओळखीचा पुरावा म्हणून मतदारांना छायाचित्र मतदान ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.ज्या मतदाराकडे हे ओळखपत्र नसतील अशा मतदारांना भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे विविध 12 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र दिलेले आहे,त्या मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करावे.जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाही,अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करता येतील.

यामध्ये आधार कार्ड,मनरेगा जॉब कार्ड, बँक,पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्रांसह पासबुक,कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहन चालक परवाना,पॅनकार्ड,रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट,फोटोसह पेन्शन दस्तऐवज,केंद्र,राज्य सरकार,सार्वजनिक उपक्रम,पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना,आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत,असे मतदार वरील कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करु शकतात.असे  उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी कळविले आहे.



 
Top