धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन आवश्यक त्या उपाययोजना लागू कराव्यात अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, समन्वयक दिलीप जोशी यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.5) याबाबत तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, तुळजापूर तालुक्यात अत्यल्प पाऊस आणि नापिकीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणून तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन उपाययोजना करण्यात याव्यात. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे पीककर्ज व इतर कर्ज माफ करावे, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, पशुधनाला नोंदीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर चाऱ्यासाी पैसे शासकीय नियमाप्रमाणे जमा करावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असून तेथे मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करावा, शेतमजूर, कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे, 26 एप्रिलपर्यंत तातडीने शासन स्तरावर उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर समितीचे समन्वयि दिलीप जोशी, अध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील, उपाध्यक्ष महादेव बिराजदार, पंडित पाटील, अशोक पाटोळे, संतोष फडतरे, गुलाब शिंदे, लक्ष्मण निकम, अजमुद्दीन शेख, बालाजी ठाकूर, महेश घोडके, नानासाहेब पाटील, खंडू हलकंबे, रहमान शेख, गणपत सुरवसे, श्रीकांत पोतदार, बंडू मोरे, तोलू पाटील यांची स्वाक्षरी आहे.


 
Top