भूम ( प्रतिनिधी) - मराठवाड्याच्या हक्काचे सात टीएमसी पाणी उजनी धरणातून सीना कोळगाव धरणात आणण्याबाबत पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी चार वेळा वेगवेगळ्या तारखा जाहीर भाषणातून दिल्या. हे काम माझ्या आमदारकीच्या काळात 80 टक्के पर्यंत झाले होते. परंतु दुर्दैवाने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला आणि काम रखडले. आमदार असताना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून दोन वर्ष मतदारसंघाबाहेर असलेल्या पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मुळेच हे काम रखडले. पालकमंत्री सावंत हे उजनीच्या पाण्याबाबत स्पेशल खोटे बोलू जनतेची दिशाभूल करीत आहेत. असा आरोप शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी शुक्रवार दि.12 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.

उजनी धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी आणणार असे आश्वासन पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिले होते. ते आमदार झाले. पण मंत्री पद न मिळाल्याने दोन वर्षे मतदारसंघ बाहेर रुसुन बसले होते. ते मतदार संघात फिरकले नाही. त्यांना निवडून दिलेल्या जनतेची काळजी असती तर ते मतदारसंघात सक्रिय राहिले असते. मात्र मंत्रीपद न मिळाल्याने ते रुसून बसले होते. नंतरच्या काळात त्यांना मंत्रीपद, पालकमंत्री पद मिळाले. त्यांनी एक तरी काम दिसेल असे केले का असा खळबळ जनक आरोप मोटे यांनी केला.उजनी धरणातून सीना कोळगाव धरणात पाणी आणण्यासाठी माझ्या काळात 80 टक्के काम झाले होते. यासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनीही पाठपुरावा केल्याचे मोटे यांनी सांगितले.

येथील संरगम मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड संदीप पाटील, राहुल बनसोडे, डॉ. नवनाथ वाघमोडे, भाऊसाहेब खरसडे, श्रीहरी नाईकवाडी, प्रताप पाटील, बापू मिस्कीन, नंदू शिंदे, नसीर शाहबर्फीवाले, गणी हावरे, खय्युम तुटके आदि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



 
Top