धाराशिव (प्रतिनिधी)- सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्तवतीने आयोजित या महोत्सवाचा आनंद घेण्याची धाराशिवकरांना जणू मेजवानीच ठरत आहे.2 मार्च रोजी दुपारी 4 वाजता शाहीर राणा जोगदंड यांनी जनजागृतीवर पोवाडा सादर करून  सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर परशुराम सातपुते यांनी वासुदेव हा कलाप्रकार सादर केला. दुपारपासूनच शहरातील नागरिकांनी जिल्हा क्रीडा संकुलावर गर्दी करण्यास सुरुवात केली.  कार्यक्रमास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत कलावंतांच्या कलागुणांना प्रचंड टाळयांच्या गजरात दाद दिली.

सायंकाळी 5 वाजता “ रायगडाला जेंव्हा जाग येते “ हे नाटक प्रा.डॉ.गणेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. नाटकातील कलाकारांची वेशभूषा, हावभाव अवर्णनीय होते. त्यानंतर जोगवा हा आई तुळजाभवानीवर आधारित कार्यक्रम विशाल शिंगाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला.

सायंकाळी 7 वाजता “संस्कृती महाराष्ट्राची“ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजाळा देण्याचे काम केले. त्यामध्ये विविध कलाकारांनी प्रत्येक कलाप्रकार हा प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवला. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत लावणी हा कलाप्रकार सादर करण्यात आला. यामध्ये सिनेसृष्टीत काम करणाऱ्या सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक यांनी लावणी सादर करून प्रेक्षकांना मोहित केले. महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमाने तुळजाभवानी स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने फुलून गेले होते.


 
Top