धाराशिव (प्रतिनिधी)-खरीप 2022 मधील नुकसान भरपाईची एकूण अनुज्ञेय रक्कम ही विमा कंपनीकडे जमा विमा हप्ता रक्कमेच्या 110 टक्के पेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदी प्रमाणे अधिकची रक्कम शासनाकडून उपलब्ध करुन घेणे बाकी असल्याने विमा कंपनीने जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील विमा ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर वितरित करण्याचे मान्य केले होते. आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असून लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांतील सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2022 मधील नुकसानीच्या केवळ 50% भरपाई वितरित केली होती. शासन व प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देताच विमा कंपनीने उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र विमा कंपनीला काही रक्कम शासनाकडून येणे असल्याने सहा मंडळातील विमा वितरण थांबविले होते. आज ही रक्कम विमा कंपनीला वितरित करणे बाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. शासनाकडून कृषि आयुक्त यांच्याकडे सदरील रक्कम जमा होणार असून त्यांच्याकडून ही रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करण्यात येणार आहे. तद्नंतर विमा कंपनी सहा मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित रु. 50 कोटीचे वितरण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होई पर्यंत याबाबतचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.


 
Top