धाराशिव (प्रतिनिधी)-श्री राम जन्मभूमी अयोध्यातून आलेल्या पपित्र अक्षता कलशाचे दि. 30 डिसेंबर रोजी धाराशिव शहरात टाळ, मृदंगाच्या गजरात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, रामभक्तांनी देशपांडे स्टॅड येथे जल्लोषात स्वागत केले. प्रत्येक चौकात फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या काढून महिलांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. तर माऊली चौकात खासदार व दोन आमदार, माजी नगराध्यक्षांनी कलश फेर धरून घोषणा देत स्वागत केले. ठिकठिकाणी शोभा यात्रेतील रथ, पालखीवर माजी नगरसेवकांसह नागरिकांकडून फुलांची मुक्तपणे उधळण करण्यात आली. 

अनंतदास महाराज मंडख येथून टाळ मृदंगांच्या निनादात अक्षता कलश यात्रा सुरू झाली. शहरातील भाजीमंडई, नेहरू चौक, माऊली चौक, जिल्हाधिकारी निवासस्थान, गाडगे महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस मुख्यालय समोरून नवीन स्वामी समर्थ मंदिर संभाजीनगर काकडे प्लॉट येथे यात्रेची सांगता झाली. 

जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अक्षता कलशाचे स्वागत केले. रथामध्ये प्रभू रामाची पालखी व राम, लखन, सीता यांची वेशभूषा केलेल्या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विश्व हिंदू परिषदेच कार्यकर्ते व रामभक्तांनी जय श्रीराम नावाच्या भगव्या टोप्या घालून यात्रेचे स्वागत केले. चौका चौकात बनाएंगे मंदिर, जय श्री राम गीतावर नृत्य करण्यात आले. 

अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिर पूर्ण झाल्याचा सर्वांनाच आनंद होत आहे. दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी कलश यात्रेवर फुलांची उधळण करून स्वागत केले. चौका चौकात महिलांनी रांगोळी काढली असून, शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. यामुळे सर्वत्र जय श्रीरामाचा गजर घुमत होता. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व रामभक्तांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून दिसत होता. 


 
Top