धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपण काम करणार असून शेतकरी आणि कामगारांची उन्नती व्हावी हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून मनोरमा रूपामाता नॅचरल शुगर काम करेल असे प्रतिपादन या कारखान्याचे संस्थापक संजय पटवारी यांनी केले, ते मनोरमा रूपामाता नॅचरल शुगर या कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री वसंतराव नागदे, संचालक तथा माजी नगराध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे, रूपामाता परिवाराचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य एडवोकेट अनिल काळे ,लघुउद्योग भारतीचे श्री प्रवीण काळे, संजय देशमाने, संजय शेटे,यांच्यासह बसवकल्याण येथील सूर्यकांत चिलाबट्टे ,शंकर नागदे,कारखान्याचे जनरल मॅनेजर रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय पटवारी यांनी या प्रथम ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी उसाला प्रति टन 2700 रुपये भाव जाहीर केला, आणि यापुढे यात वाढ होईल असा विश्वासही ऊस उत्पादकांना दिला. शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे पैसे देणार असून या व्यवसायातून शेतकरी - कामगार यांच्यासोबत या परिसरातील सर्वांच्या कल्याणासाठी आपण काम करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
प्रारंभी श्री संजय पटवारी आणि सौ. अंजली पटवारी यांच्या हस्ते ट्रॅक्टर मधील उसाच्या मोळीचे पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची विधिवत पूजा करून मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देवसिंगा परिसरातील शेतकरी ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.