तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हयात अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी माजी मंञी मधुकर चव्हान यांनी मुखमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, धाराशिव जिल्हयासह तुळजापूर तालुक्यात मागील काही दिवसामध्ये सर्व मंडळामध्ये अवकाळी पावसामुळे मोठया प्रमाणावर रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते होवुन शेती रबी पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक पिके पुर्णता जाण्याची मोठी भिती निर्माण झाली आहे. यापुर्वीच पाऊसाअभावी खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. काही शेतकऱ्यांना पिकविमा भरुन ही विमा आला नाही.
त्यातच आता अवकाळीचा तडाखा बसल्यामुळे कांदा, द्राक्ष, गहू, मका,ऊस,तुर, दाळींब,केळी यासह अनेक बागायत पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णता हतबल होऊन अडचणीत सापडला आहे. तरी तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत जाहीर करुन दिलासा दयावा अशी मागणी मधुकर चव्हाण यांनी केली आहे.