भूम (प्रतिनिधी)- भूम आगारातून भूम ते डहाणू सुरू करण्यात आलेली बस सेवा बंद केल्याने तालुक्यातील ग्रामस्थांच्यावतीने आगार प्रमुख दीपक लांडगे यांना नागरिकांनी घेराव घालत बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे भूम निवासी डॉ. अमोल घुले यांनी भूम, परंडा, वाशी परिसरातील लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा (ऑपरेशन वगैरे) ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे चालू केले आहे. त्यानंतर डॉ. घुले यांना काही जणांनी मोफत आरोग्य सेवा बंद करा म्हणून धमक्याही दिल्या होत्या. परंतु डॉ. अमोल घुले यांनी डहाणू येथील आपल्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये भूम परिसरातील लोकांसाठी मोफत सेवा सुरूच ठेवली होती. त्यासाठी भूम ते डहाणू बस सेवा सुरू करण्यात आली होती. अखेर हि बससेवा 29 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहे.
डॉ. अमोल घुले यांनी भूम, परांडा व वाशी या तिन्ही तालुक्यातून नागरिकांचे सर्व ऑपरेशन मोफत सुरू केले आहे.ठाणे जिल्ह्यातील डहाणू हा भाग नागरिकांना नवीन असल्याने येथे जाण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. तर काही नागरिकांना डहाणू येथे कसे जायचे हे समजत नसल्याने. मोफत उपचार मिळत असताना देखील अंगावर दुखणे काढत असत. याची दखल घेत डॉ. अमोल घुले यांनी भूम आगारातून बस सेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुख यांच्याकडे मागणी केली.या मागणीस प्रतिसाद देत बस सेवा देखील सुरू करण्यात आली. दरम्यान ही बस सेवा सुरळीत सुरू झाल्याने नागरिक देखील मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी बाहेर पडू लागले.
त्यात या मार्गावर शिर्डी,त्र्यंबकेश्वर ही प्रमुख देवस्थाने असल्याने पाथरुड येथील पेढा व्यापारी यांची ही पेढा ने - आण करण्यासाठी सोय झाल्याने सदरील बसला अधिक प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक फेरीला बुकिंग ही सुरू झाली. तब्बल 18 डिसेंबर पर्यंत या बसची बुकिंग नागरिकांनी केली असताना देखील ही बस सेवा आगाराच्या वतीने बंद केल्याने तालुक्यातील नागरिकांनी पुन्हा तातडीने बस सेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुख यांना घेराव घातला होता. तातडीने बस सेवा सुरू न केल्यास आगारातील सर्व बस आम्ही एक दिवस बंद करू असा इशारा यावेळी घेराव घातलेल्या नागरिकांनी आगार प्रमुख यांना दिला आहे.
7 नोव्हेंबर रोजी ही गाडी सुरू झाली होती. 18 हजार किलोमीटर धावली असून, यातून आगाराला 6 लाख 64 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.तरी देखील ही बस बंद केल्याने या मागे कोणत्या नेत्याचा अदृश्य हात आहे या संदर्भात भूम, परंडा, वाशी या तिन्ही तालुक्यात चर्चा सुरू झाली असून, आगामी निवडणुकीत त्या अदृश्य हाताला धडा शिकवू असे बोलले जात आहे.