धाराशिव (प्रतिनिधी)- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एनईपीचा व्यावहारिक अर्थ लावणे गरजेचे असून विद्यार्थ्याने पदवीधर होताना स्वताःच्या पायावर उभे रहावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये निर्माण करणे ही एनईपीची अपेक्षा असल्याचे मत डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) वतीने जिल्ह्यातील प्राचार्य, प्राध्यापकांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  अंमलबजावणी या विषयावर येथील हॉटेल पुष्पक पार्क येथे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी एमकेसीएलच्या वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. रेवती नामजोशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना विवेक सावंत म्हणाले की, मराठवाड्यात स्वायत्त महाविद्यालयाची संख्या असून कमी असून विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयाची संख्या जास्त आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा व्यवहारीक अर्थ लावणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने पदवीधर होत असतानाच त्याला स्वताःच्या पायावर उभे रहता यावे याचे यासाठी आवश्यक कौशल्य विद्यार्थ्यात विकसित करणे ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अपेक्षा आहे.

विद्यार्थ्याला आपल्या राहत्या परिसरात नवनवीन उद्योग, नोकरीच्या संधी निर्माण करुन त्याला जगाशी जोडणे आवश्यक असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून हे साध्य होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर यांनी केले. यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. रेवती नामजोशी यांनी पॉवर पाईंट सादरीकरणाद्वारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्या अंतर्गत येणाऱ्या विविध घटकांचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच उपस्थित असणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. या परिसवांदासाठी धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षणतज्ञांची उपस्थिती होती.


कोण आहेत विवेक सावंत सर ?

विवेक सावंत सर हे भारतीय बनावटीचे पहिले सुपर कॉम्प्युटर परम 1000 तयार करणाऱ्या टीम मधील वैज्ञानिक, नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या सल्लागार समितीचे सदस्य, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजे एमकेसीएलचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सध्याचे प्रमुख मार्गदर्शक असून खऱ्या अर्थाने दोन करोड विद्यार्थ्यांचे शिक्षक आहेत.


 
Top