धाराशिव (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे यात्रा व धार्मिक कार्यक्रमाला अडचण येत असल्यामुळे ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थ पांडुरंग अंगद मते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानाला क देवस्थान तिर्थक्षेत्राचा दर्जा असून देवस्थानच्या विकास कामांसाठी निधी मंजुर झालेला आहे. परंतू मंदिर परिसरात अतिक्रमणामुळे अडचण निर्माण झाली आहे. खंडोबा देवस्थान चंपाषष्टीला सटिची यात्रा भरत असून या यात्रेला हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. मागील वर्षी या यात्रेतील धार्मिक कार्यक्रमात भाविकांची गर्दी झाली मात्र अतिक्रमण असल्यामुळे एका भाविकाचा बळी गेलेला आहे. मात्र प्रशासन जागे झालेले नाही. तसेच दर रविवारी मंदीरात धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या अतिक्रमणाबाबत ग्रामस्थांनी वारंवार लेखी व तोंडी अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. दि.30 नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास देवस्थान मानकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर जयवंत भातलवंडे, पांडुरंग भातलवंडे, सज्जन कोठावळे, तुकाराम भातलवंडे, नारायण ढवळे, अविनाश पांचाळ, ज्ञानदेव खंडागळे व भाऊ सुतार यांच्या सह्या आहेत.