धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर आंदालने सुुरू आहेत. मात्र सरकारकडून वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे नैराश्यातून करजखेडा येथील प्रसाद बालाजी चव्हाण या युवकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारने तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करजखेडा येथील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

मागील कित्येक दिवस मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. लोकशाही मार्गाने समाज आंदोलन करत आहे. तरीही शासनाकडून काहीही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. याच नैराश्यातून करजखेडा येथील प्रसाद बालाजी चव्हाण या युवकाने आत्महत्या केली आहे. शिक्षण घेऊनही काही फायदा होणार नाही, अशी त्याची भावना तयार झाली होती. तशीच भावना समाजातील सर्व विद्यार्थ्यांची होत असून यातून आत्महत्या होत आहेत. शासनाने लवकरात लवकर मराठा समाजास आरक्षण द्यावे. आम्हाला न्याय न मिळाल्यास समस्त करजखेडा ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर सरपंच सुधीर भोसले, धनाजी साळुंके, विनायक साळुंके, गोविंद गरड, सचिन भोसले, प्रशांत चव्हाण, सागर चव्हाण, सत्यवान सुरवसे, प्रसाद भरगंडे, प्रणव बागल, वैभव चव्हाण आदींची स्वाक्षरी आहे.


 
Top