वाशी (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा हा केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित न्हवता तर हा लढा अखंड भारताच्या निर्मितीसाठी भारत मुक्तीसंग्रामासाचा लढा होता. असे प्रतिपादन मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे जिल्हा संयोजक युवराज नळे यांनी शहरातील श्री अकॅडमी येथे लढा मुक्तीस्वांतंत्र्याचा या पुस्तकच्या प्रकाशन सोहळ्यात केले. यावेळी ॲड. प्रदिप देशमुख, एम डी उंदरे, श्री अकॅडमीचे संचालक माळी या मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार (दि 10) रोजी पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले युवराज नळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की, ज्यावेळी इंग्रजानी भारतीयांना सत्तेच हस्तातरण करून देशातून काढता पाय घेतला त्यावेळी भारतात 565 स्वतंत्र संस्थाने अस्तिवात होती. अशा खंडित आणि विभाजित प्रकारचं स्वातंत्र्य देशाला बहाल करून इंग्रज निघून गेले. ही सर्व संस्थाने भारतात विलीन करून अखंड भारत निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र हैद्राबाद, जुनागढ आणि काश्मीर ही संस्थाने वगळता इतर संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली.
यामध्ये हैदराबाद संस्थानचा शासक असलेला निजाम मीर उस्मान याने भारतात विलीन होण्यास नकार दिला आणि हैद्राबाद स्टेट या स्वतंत्र देशाची मागणी युनो या जागतिक संघटनेकडे केली. जगातील मुस्लिमांचा खलिफा होण्याची म्हत्वकांक्षा निजामाने बाळगली होती. निजामाच्या रझाकार सैनिकांकडून हैद्राबाद संस्थांनातील महिला, तरुण, बालक यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात होते. तसेच स्वतंत्र भारतात विलीन होण्याची मागणी करणाऱ्यां लोकांची हत्या रझाकार सैनिकांकडून अत्यंत क्रूरपने केली जात होती.
निजाम मीर उस्मान याच्या या अत्यंत गंभीर बाबीची दखल घेत निजामाला वेळीच रोखण्याची गरज लक्षात घेऊन तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो राबवून लष्करी कारवाई केली. या कारवाईत अवघ्या 109 तासात मीर उस्मान हा निजाम शरण आला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. असे नळे यांनी सांगितले.
तसेच आपल्या मराठवाड्यातील त्याकाळचे 5 जिल्हे हैद्राबाद संस्थानाचा भाग होते. आपल्या जिल्ह्यातील अनेक हुतात्म्यांनी या हैद्राबाद मुक्तिसंग्रामात आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा हा लढा म्हणजे केवळ मराठवाडा मुक्तीसंग्रामापुरता मर्यादित नसून भारत मुक्तीसंग्रामासाठीचा लढा असल्याचे युवराज नळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती वाशी यांच्यावतीने करण्यात आले.