धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कळंब तालुक्यातील गौर येथील स्मारक दुरुस्ती व बांधकाम करण्यासाठी व धाराशिव तालुक्यातील आळणी नाका येथे स्मृतीस्तंभ बांधण्यास निधी मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गुरुवारी (दि.21) केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना 202324 अंतर्गत जिल्ह्यातील 13 ठिकाणी शासनाने निधी दिलेला आहे. परंतु कळंब तालुक्यातील गौर येथील हुतात्मा स्मारक दुरुस्तीसाठी 15 लक्ष रुपये निधीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे धाराशिव तालुक्यातील आळणी येथील करोडगिरी नाका येथे स्मृतीस्तंभ बांधण्यासाठी 30 लक्ष निधी मिळणे गरजेचे आहे. सदर दोन्ही ठिकाणी निधी मिळण्यासाठी पूर्वीपासून मागणी असताना या दोन्ही ठिकाणी निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी दुधगावकर यांनी निवेदनात केली आहे.