धाराशिव (प्रतिनिधी)-पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानी पोटी जिल्हायातील 40 महसुल मंडळांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश या पुर्वीच झाले असुन उर्वरीत 17 महसुल मंडळाना देखील 25 टक्के अग्रीम देण्याची अधिसुचना आज जिल्हाधिकारी यांनी जारी केली आहे. 

खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. राज्य शासनाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनीधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाहणी मध्ये 40 महसुल मंडळात 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते, व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी या बाबत अधिसुचना काढुन जिल्ह्यातील 40 महसुल मंडळाना या पुर्वीच 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तर सध्याची पिक परिस्थीती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी उर्वरीत 17 महसुल मंडळाची अधिसुचना आज काढली आहे. यामुळे आता जिल्हयातील सर्व महसुल मंडळांना 25 टक्के अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

खरीप पिकांची परिस्थीती अतिशय बिकट असुन शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा  परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे. दोन दिवसांपुर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी उपग्रहाच्या माध्यमातुन नुकसानीची माहिती व वास्तव परिस्थीती  विचारात घेऊन विमा कंपनीला आवश्यक ते निर्देश देण्याचे सुचित केले होते. महायुती सरकार सदैव शेतकऱ्यांसोबत असुन विमा कंपनीला यात कसलीही कुचराई करु देणार नाही.


 
Top