धाराशिव (प्रतिनिधी)- निती आयोग, भारत सरकार, मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना (BIS) यांच्या धोरणात्मक भागीदारीतून देशातील निवडक 10 आकांक्षीत जिल्ह्याकरीता तलावांचे पुनरुज्जीवन (  Rejuvenation of Water Bodies ) हा एक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये शेतकर्‍यांनी स्वखर्चाने गाळ काढुन नेणे व गाळ उपसणार्‍या मशिनचे भाडे शासन देणार असे धोरण निश्चित झालेले होते. तलावांचे पुनरुज्जीवन ( Rejuvenation of Water Bodies  ) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्पातील गावांत भारतीय जैन संघटना यांनी जनजागृती व समुहसंघटन करुन लोकांमध्ये गाळ नेण्याबाबत जागृती निर्माण केली. आज रोजी या योजनेंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील विविध यंत्रणेमार्फत एकुण 48 तलावांमधुन सुमारे 13 लक्ष घ.मी. गाळ शेतकर्‍यांनी स्वतःहुन वाहतुक खर्च करुन आपापल्या शेतामध्ये टाकला.

तसेच महाराष्ट्र शासनाने राज्यातील जलसाठ्यांमधला गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्य शासनाची महत्त्वकांक्षी अशी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हि योजना राज्यात कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

बी.जे.एस. (भारतीय जैन संघटना) आणि ATE Chandra Foundation  या संस्थांच्या भागीदारीने संपुर्ण राज्यात हि योजना राबविणे प्रस्तावित आहे. या योजनेतर्ंगत गाळ काढण्याची अंमलबजावणी अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत करण्यात येणार्‍या कामांचे मुल्यमापन अवनी अॅपद्वारे करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर या योजनेची अंमलबजावणी अधिकारी कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग हे राहतील.

या योजनेमध्ये जलसाठ्यातील गाळ उपसा करण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च शासनाकडुन देणे प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच या योजनेमध्ये अत्यल्प व अल्प भुधारक शेतक-यानी त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च (अनुदान) देण्यात येईल व बहुभुधारक शेतकरी हे स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणे हे प्राथमिक धारणा आहे शिवाय विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानास पात्र राहतील. सदर लोक बहुभुधारक असले तरी अनुदानास पात्र राहतील. पसरविण्यात आलेल्या गाळाच्या रु. 35.75/- प्रति घ.मी. प्रमाणे एकरी रु.15000/- च्या मर्यादेत म्हणेजच एकरामध्ये 400 घ.मी. गाळाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. हे अनुदान फक्त 2.50 एकर पर्यंत म्हणजेच रु. 37500/- अधिकाधिक देय राहील.

सद्यस्थितीमध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुण 6 ठिकाणी गाळ काढण्यात आला असून 3 लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत धाराशिव जिल्ह्यात एकुण अंदाजीत 16 लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आलेला आहे. सदर गाळ हा सुमारे 2000 हेक्टर जमिनीवर पसरविण्यात आला आहे. या सर्व योजनेची अंमलबजावणी मृद व जलसंधारण विभाग, उस्मानाबाद कार्यालयाने व्यवस्थीत रित्या पार पाडली. या योजनेकरिता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे हे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आणि श्री. सि. के. कलशेट्टी, जिल्हा जलसंधारण अधिकारी उस्मानाबाद यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेचे सदस्य सचिव म्हणुन काम पाहिले.

तलावांतील गाळ काढण्याचे काम केल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता पुर्नस्थापित झाली व

काढलेला गाळ शेतामध्ये वापरण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनीची सुपितकता वाढुन कृषी उत्पन्नात वाढ होईल.


 
Top