कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकात जाण्यासाठी नागरिकांना चक्क वाहत्या सांडपाण्यातुन मार्ग काढावा लागतो. कळंबचे बस स्थानक सारखे गजबजलेले असते. येथून लांब पल्ल्याच्या गाड्यांचा सारखा राबता असतो. दररोज हजारो नागरिक एस टी बसद्वारे प्रवास करतात. कळंब स्थानकावरून शेकडो बसेसची ये-जा असते. नागरिक व शालेय विद्यार्थी बसद्वारे प्रवास करतात. 

सुदैवाने कळंब बसस्थानक भले मोठे विस्तृत आहे. परंतु स्वच्छतेचे तीन तेरा झाल्याचे दिसून येते. बसस्थानकावर जागोजागी खड्डे पडलेले असून त्यामध्ये पाणी साचलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारातुन चक्क नालीचे सांडपाणी उघड्यावरून वाहत आहे. यातूनच नागरिकांना नाकाला रूमाल लाऊन जिव मुठीत घेऊन आत-बाहेर ये-जा करावी लागते. त्यातच जर बस अथवा इतर वाहन आले तर नागरिकांच्या अंगावर सांडपाण्याचा अभिषेक झाल्यापासून कोणीही रोखु शकत नाही. 

बसेस, पॅसेंजर च्या गाड्या, पॅसेंजर, रिक्षा ई साठी एकच प्रवेशद्वार कार्यरत आहे हे विशेष. या सांडपाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी न. प. प्रशासन, एस. टी. महामंडळ यांना निवेदन देऊन अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसून येत नाही. बस स्थानकाला सांडपाण्याच्या तळ्याचे स्वरूप आलेले असून प्रवाशांना या सर्व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तरी संबंधित अधिकारी वर्गांने या गैरसोयीचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.


 
Top