जळकोट / प्रतिनिधी-

  जळकोटपासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर जेवळी तालुका लोहारा येथील रहिवासी असलेल्या आई व मुलगी यांचा जळकोट तालुका तुळजापूर लगत असलेल्या साठवण तलावात दिनांक 31 मार्च 2023 रोजी रात्री बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह जेवळी गावावर शोककळा पसरली आहे.                                                                                   

  याबाबत थोडक्यात वृत्त असे की जेवळी येथील रहिवासी असलेल्या पांडुरंग खंडू गाडेकर वय 50 वर्षे यांची  मुलगी जयश्री राम राघोजी वय 28 वर्षे हि अक्कलकोट तालुक्यातील काझीकनबस येथे सासरी राहत होती. काही कारणानिमित्त जेवळी येथे आणण्यासाठी आई प्रभावती गाडेकर वय 45 वर्षे या जयश्रीला घेण्यासाठी काझी कनबस येथे गेल्या होत्या. दिनांक 31 मार्च 2023 रोजी सकाळी जावई यांनी पत्नी जयश्री व सासू प्रभावती यांना अक्कलकोट ते जळकोट जाणाऱ्या बसने सकाळी आठ वाजता पाठवून दिले. संबंधित दोघी जळकोट येथे सकाळी साडेनऊ वाजता उतरल्या. मात्र सायंकाळपर्यंतही दोघी जेवळी येथे पोहोचल्या नसल्याने पांडूरंग गाडेकर यांचे जळकोट येथे  साडू असल्याने तेथे थांबल्या असतील म्हणून साडूकडे चौकशी केली असता त्यांनीही जळकोट येथे आल्या नसल्याचे सांगितल्याने काळजीत भर पडून शोधाशोध सुरु झाली. 31 मार्च रोजी रात्री तलावाच्या पायावर एका महिलेचे प्रेत तरंगत असल्याचे तळयाशेजारील शेतकऱ्यांना दिसून आल्याचे जळकोट येथे  समजल्याने कांही नागरिकांनी नळदुर्ग पोलीसांना माहिती दिल्याने पोलीसांनी घटणास्थळास भेट देऊन प्रेत ताब्यात घेतले असता सदर महिला जेवळीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सोबत असलेल्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. दिनांक  01 एप्रिल रोजी सायंकाळी उशीरा जयश्री हिचे प्रेत त्याच तळयात मिळून आले. नळदुर्ग पोलीसांकडून दिनांक 02 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत रितसर पंचनामा करण्यात आला. जळकोट पासून हंगरगा ( नळ ) रस्त्यालगत अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तळ्याकडे कशासाठी गेल्या ? व बुडून मृत्यू पावल्या याबाबत कुटुंबीयांसह अन्य नागरिक संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण पोलिसांनी शोधावे असे नातेवाईकांसह नागरिकांतून बोलले जात आहे.  मृत्यूचे गुढ पोलिसांनी उकल करावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. 

याबाबत पांडुरंग खंडू गाडेकर यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसात गु. र. नं. 22/2023, कलम 174 सीआरपीसी नुसार आकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल जांभळे, शेख आदींनी स्थळपंचनामा करून जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही प्रेते दाखल केल्यावरून वैद्यकीय अधिकारी विष्णू सातपुते यांनी उत्तरीय तपासणी करून दोन्ही प्रेतं जेवळी येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. सायंकाळी उशिरा उत्तर जेवळी  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जयश्री हिस तीन वर्षे ते सात वर्षे वयाची तीन बालके असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top