धाराशिव / प्रतिनिधी-

आजचा दिवस परांडा वासीयांसाठी ऐतेहासिक आणि महत्वाचा आहे. अनेक वर्षांपासून याठिकाणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु व्हावा ही प्रत्येक पक्षकार,विधीज्ञ आणि नागरिकांची मागणी होती. दुर्गम भागातून येणा-या पक्षकारांना न्याय देण्यासाठी न्यायमंदिर त्यांच्या जवळ आला असून या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद घेतली जाईल,असे प्रतिपादन उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती अरुण रामनाथ पेडणेकर यांनी आज परांडा येथे केले. येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शंकरराव शेंडे, परांडा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विश्वास मोहिते, महाराष्ट्र व गोवा बार आसोसिएशनचे अॅड. मिलींद पाटील, परांडा बार काउंसिलचे अध्यक्ष ॲड.खरसडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव अॅड. सुधाकर आव्हाड अॅड. संग्राम देसाई आदी उपस्थित होते.

  पुढे न्यायमूर्ती पेडणेकर म्हणाले की ई-फाइलिंग ही काळाची गरज बनली आहे, पक्षकार देशातून कुठल्याही ठिकाणावरून वकीलाच्या मदतीने संबंधित न्यायालयात ऑनलाईनपध्दतीने अर्ज करून दाद मागू शकतो,आणि ऑनलाईन सुनावण्या सुरू ही झाल्या आहेत. येणा-या काळात ई-फाइलिंग आणि ई- सुनावणी मुळे अनेक प्रकरण वेगवान आणि कमी खर्चात होतील, त्यामुळे वकील मंडळीने याबाबत जनजागृती करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेल्या ई-कोर्ट प्रणाली विषयी कॉफी टेबल पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे म्हणाल्या पक्षकारांच्या सोयी आणि सुलभतेसाठी या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा उद्घाटन करण्यात आला आहे आणि स्थानिकांसाठी हे वरदान ठरणार तसेच लोकांपर्यंत पोहचून त्यांना न्याय मिळवून देणे हे न्यायाल्याचे हेतू आहे. भूम आणि परांडा येथील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. भविष्य ई- फाइलिंग आणि ईकोर्टाचा आहे. ई-कोर्ट प्रणाली द्वारे न्यायालयात प्रकरणे दाखल करणे व पक्षकार आणि वकिलांना पारदर्शीप्रमाणे न्यायालयीन प्रक्रीया पाहता यावी या उद्देशाने ई-कोर्ट प्रणाली सुरु झाली आहे. आज या आनंदाच्या क्षणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रकाशित करण्यात कॉफी टेबल आली आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही न्या.शेंडे यावेळी म्हणाल्या.

 यावेळी २०२० नंतर नोंदणी झालेल्या वकीलांना कायदा पुस्तीकांचे वितरण महाराष्ट्र व गोवा बार आशोशिएशन च्या वतीने करण्यात आले. या न्यायालयामुळे न्यायालयीन कामकाज गतीमान होऊन पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळून गैरसोय थांबण्यास मदत होईल. विशेष म्हणजे परंडा विधानसभा मतदार संघात २ ठिकाणी परंडा व भूम अशा लहान तालुक्यात असे न्यायालय स्थापन होण्याची बहुधा महाराष्ट्रातील एकमेव घटना आहे. यावेळी महाराष्ट्र व गोवा बार आसोसिएशनचे अॅड. मिलींद पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच सुधाकर आव्हाड यांचे हिंदू वारसा कायदा विषयावर तर अॅड. संग्राम देसाई यांचे भ्रष्टाचार कायदा या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परांडा बार काउंसिलचे अध्यक्ष ॲड.खरसडे यांनी केले. सूत्रसंचालन परांडा दिवाणी न्यायाधीश (क-स्तर)मयुरा निंबाळकर आणि ॲड.संतोष सूर्यवंशी यांनी केले तर ॲड. नुरोद्दीन चौधरी यांनी आभार मानले.

 या कार्यक्रमास भुम,परांडा, माढा , बार्शी आणि उस्मानाबाद येथील विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top