कळंब / प्रतिनिधी-
डिजिटल चा प्रभाव वाढल्यामुळे प्रिंट मिडिया अडचणीत आहे. गुळाचा चहा दहा रुपयाला आपण घेतो, पण पाच रुपयाचा पेपर घेत असताना मात्र घाम फुटतो. या तालुक्यातून यापुढे चांगले एक हजार पत्रकार तयार व्हावेत. गाव पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांपुढे खरी आव्हाने आहेत. समाजासाठी काम करतांना सद्सद्विवेकबुद्धी चे स्मरण करून पत्रकारांनी काम करावे. असे मत ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले.
आ. कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या कळंब तालुका पत्रकार संघाच्या पत्रकार भवन च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकर व स्व.शिवशंकर बाप्पा घोंगडे,यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व फित कापून उद्घाटन करण्यात आले..या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर,अभय देशपांडे, आ. कैलास पाटील, ह.भ.प. बंडोपंत बापू दशरथ, शिवाजी कापसे, डॉ.प्रतापसिंह पाटील,जिल्हा उपाध्यक्ष बालाजी निरफळ,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
सामाजिक भान ठेवून काम करणारा हा पत्रकार संघ आहे. कोविड काळात सर्व पत्रकारांना पत्रकार संघाकडून विमा कवच देण्यात आले. जिल्हा दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. सकारात्मक बाजू मांडून पत्रकार संघ काम करत आहे. निवडणूकीपुरते पक्ष आणि चिन्ह असते. नंतर लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर विधानसभेत बोलतांना बेल वाजवली जात आहे. कांदा आदी विषयांवर माध्यमांनी शेतकऱ्यांचा विचार करावा. असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. कैलास पाटील हे होते. या वेळी शिवाजी कापसे, डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी हि आपले विचार मांडले. कार्यक्रमात कोविड काळात निधन पावलेले स्व. राजेंद्र मुंदडा यांच्या नावाने यावर्षीचा कृषी वैभव पुरस्कार लिंबराज चोंदे यांना, मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी पत्रकार संघाला मदत करणाऱ्यांचा हि सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य जगदीश गवळी यांनी तर आभार सतीश टोणगे यांनी मानले.