धाराशिव / प्रतिनिधी-

बाजारात कांद्याचे भाव अचानक कोसळल्याने अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रति क्विंटल रु. 300 अनुदान जाहीर  केले असून पर राज्यात विक्री केलेल्या कांद्याला देखील याच प्रमाणे अनुदान देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री  एकनाथ शिंदे  यांच्याकडे केली आहे.

  धाराशिव सह सीमा भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा बेंगलुरू,हैद्राबाद व बेळगाव यासह इतर ठिकाणी अत्यंत अल्प दराने विकला आहे. अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात मोठ्या कष्ठाने पिकवलेला चांगल्या प्रतीचा शेतमाल कवडीमोल दराने जात असताना मोठ्या वेदना होतात. सरकारने घोषणा केल्या प्रमाणे या अनुदानाचा लाभ हा केवळ राज्यात विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे इतर राज्यात कांदा विक्री केलेल्या धाराशिव सारख्या सीमावर्ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.

इतर राज्यात विक्री केलेल्या कांद्याची शेतकऱ्यांकडे संगणकीय (कंप्युटराईज्ड) बिले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना या अनुदानाचा लाभ देणे शक्य आहे. सरकारने याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करणे आवश्यक असून आजवर शिंदे फडणवीस सरकार बळीराजाच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहिले आहे. त्याचप्रमाणे या संकटात देखील शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असून इतर राज्यात विक्री केलेल्या कांद्यासाठी देखील शेतकऱ्यांना, शासनाने जाहीर केलेल्या प्रती क्विंटल रु ३०० अनुदानाची रक्कम देण्याची आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे केली आहे.

 
Top