उमरगा / प्रतिनिधी-
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेला देशभरातील महिला, पुरुष व युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत झाले असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संसद व राज्याराज्यात काँग्रेसचे संख्याबळ निश्चित वाढेल असा विश्वास देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या वतीने उमरगा येथे मंगळवारी (दि. 7) माझा गाव माझी शाखा या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उदघाटन सत्रात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, महासचिव कोकोजी, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावेरू, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मितेंद्र सिंग, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, उपाध्यक्ष प्रशांत ओगले, शिवराज मोरे, अभिजित चव्हाण, अविनाश मोरे, सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सचिव महेश पाटील, सरचिटणीस दीपाली ससाणे, श्री. याज्ञवल्क्य जिचकार, सहप्रभारी प्रदीप सिंघल, योगेश राठोड, भैय्या निरफळ, तनया कडगांचे, संगीताताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या स्थापनेनंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आताचे खासदार राहूल गांधी यांच्यापर्यंत कोणीही केवळ निवडणुकीपूरते काम केले नाही. सतत देशाचा आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार काँग्रेसने केला आहे. देश मजबुत बनवायचा असेल तर आर्थिक, सामाजिक दरी कमी करून लोकशाही मजबूत झाली पाहिजे. हा विचार घेऊनच काढलेल्या भारत जोडो यात्रेत युवकांना देशाच्या सर्वच भागाची सांस्कृतिक ओळख झाली. त्यामुळे काँगेस पक्षाचे संघटन देखील मजबूत झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसने माझा गाव माझी शाखा अभियानांतर्गत गावागावात काँग्रेसची सक्षम फळी निर्माण केल्यामुळे पक्षाला आगामी काळात चांगले भवितव्य असल्याचेही ते म्हणाले.
प्रस्ताविकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील म्हणाले की, सन 2024 च्या निवडणुकीत देशात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेने देशभरात झंझावात निर्माण झाला असून युवकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. याचा आगामी लोकसभा व विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचे सांगून प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून युवकांनी आपापल्या गावात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी एकदिलाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.