उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आयुष्यमान भारत प्रधान  मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी हे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब असून याचा लाभ कमाल मर्यादा 5 लाख रुपये प्रती कुटुंब प्रती वर्ष घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारांवर 34 विशेष श्रेणीत उपचार असून त्यामध्ये 1209 उपचारपद्धती या योजनेच्या रुग्णालयांतर्गत पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

 कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी www.mera.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा 14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्रांशी संपर्क साधावा. अधिक सोयी करिता ह्या योजने अंतर्गत नाव शोधण्यासाठी गाव निहाय तसेच वार्ड निहाय यादी पाहण्यासाठी www.aapkedwarayushman.pmjay.gov.in ह्या संकेत स्थळाला भेट द्यावी, असेही डॉ. ओम्बासे यांनी सांगितले आहे.

  या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील विशेष सेवा उपलब्ध आहेत. जसे की जळीत, हृदयरोग, हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचार, आर्कस्मिक सेवा, त्वचारोग, अंत:स्त्राव संस्थेचे विकार, कान-नाक व घसा रोग, सर्वसाधारण औषधशास्त्र चिकित्सा, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, व्याधी चिकित्सा, संसर्गजन्य आजार, इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजी,  जठरांत्रमार्गाचे रोग, कर्करोगावरील औषधोपचार, नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, मुत्रपिंडविकार, मज्जातंतूचे विकार, मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, नेत्ररोग शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, बालरोग   शस्त्रक्रिया, बालरोग कर्करोग, प्लास्टीक सर्जरी, आस्कमिक वैद्यकीय उपचार, कृत्रिम अवयव उपचार, फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार, किरणोत्सर्गाव्दारे कर्करोगचिकित्सा, संधिवात सबंधी उपचार, जठर व आंत्रविकाराच्या शस्त्रक्रिया, कर्करोगाच्या शस्त्रक्रिया, मुत्रवह संस्थेच्या विकारांवरील शस्त्रक्रिया, मानसिक आजार आणि जबडा व चेहऱ्याच्या अस्थींवरील शस्त्रक्रिया आदी 34 आजारांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ दिला जातो.

    उस्मानाबाद जिल्यातील आयुष्मान भारत योजने अंतर्गत एक लाख 32 हजार 84 कुटुंब आयुष्मान भारत योजनेकरीता पात्र आहेत. या कुटुंबातील जवळपास 5 लाख 20 हजार 696  आयुष्मान भारत योजनेचे पात्र लाभार्थी असून त्यापैकी अद्यापपर्यंत एक लाख 50 हजार 584  लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड तयार करून घेतले आहे.महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2020 पासून एकत्रितपणे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. तेव्हापासून अद्यापपर्यंत योजनेच्या 20 हजार पात्र लाभार्थी रुग्णांना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयांद्वारे  उपचार देण्यात आले आहेत.

   या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत आयुष्मान कार्ड तयार करून घेतले नाही त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार 23 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023  या दरम्यान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड ई-केवायसी (E-KYC) करता यावी याकरिता ग्रामीण भागात गावनिहाय आणि शहरी भारत वॉर्ड निहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. तरी पात्र लाभार्थ्यांनी आपले मूळ शिधा पत्रिका किंवा प्रधानमंत्री यांचे पत्र व आधार कार्ड सोबत घेऊन जवळच्या सीएससी (CSC) केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधून आयुष्मान कार्डकरीता आवश्यक असणारी ई-केवायसी (E-KYC) करून घ्यावी.

 जिह्यातील एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत 18 अंगीकृत रुग्णालये पुढीलप्रमाणे आहेत.

 शासकीय रुग्णालये :

  जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, जिल्हा स्त्री रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय परांडा, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय भूम, ग्रामीण रुग्णालय वाशी आदी शासकीय रुग्णांलय आहेत.

 खाजगी रुग्णालये :

 उस्मानाबाद शहरातील सुविधा हॉस्पिटल,  चिरायू हॉस्पिटल,  वात्सल्य हॉस्पिटल, नवोदय हॉस्पिटल,  वाशी येथील श्री विठ्ठल हॉस्पिटल, कळंब येथील कृष्णा हॉस्पिटल, उमरगा येथील साई हॉस्पिटल, चिंचोली हॉस्पिटल, डिग्गीकर हॉस्पिटल आणि डॉ. के. डी.  शेंडगे हॉस्पिटल आदी खाजगी रुग्णालये आहेत.

 
Top