उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शासनाच्या विविध सेवा या घटनेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या योजना आहेत. सर्वांना समान, निरंतर आणि समान संधी या तरतुदीप्रमाणे सेवेचा अंतर्भाव केला आहे. शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत कशा पध्दतीने पोचवता येणे शक्य आहे त्याची जबाबदारी शासकीय विभाग पार पाडत असतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आणि शासनाच्या मदतीने स्थापन झालेल्या विधि सेवा प्राधिकरण गरजु आणि होतकरु नागरिकांना  सेवा देण्यास कटीबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा  जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस.शेंडे यांनी आज येथे केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे न.प.सभागृह येथे आयोजित योजनांच्या महामेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

  यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस.आर.मुंढे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे सदस्य मिलिंद पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव आदी उपस्थिते होते.

 या विधी सेवा देत असताना विधी म्हणजे कायदा प्रत्येक नागरिकांशी निगडित असून त्याचे जीवनमान आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्व बाबींवर त्याचा परिणाम किंवा उपयोग होत असतो. वृध्द, लहान, विधवा, निराधार, दिव्यांग किंवा बेरोजगार या सर्वांना योजनांची माहिती मिळावी म्हणून या शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही न्यायाधीश श्रीमती शेंडे म्हणाल्या.

  या ठिकाणी सर्व शासकीय विभागामार्फत विविध शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच या स्टॉलच्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. काही लाभार्थ्यांनाही लाभाचे या ठिकाणी वितरण करण्यात आले. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात काही ठिकाणी शिक्षणाचा आणि निधीचा अभाव असतो. अशा प्रत्येक ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही माहिती पोहोचविणे शक्य होत नसल्यामुळे या मेळाव्याचे आयोजन करण्यामागचा उद्देश आहे.

  जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रकाशीत करण्यात आलेल्या शासकीय योजनांची माहिती असलेल्या “योजना शासनाच्या जनतेच्या विकासाच्या” या पुस्तिकेचेही यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती शेंडे, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले. या पुस्तकामध्ये शासनाच्या विविध विभागातील योजनांची माहिती देण्यात आली आहे. 

            जिल्ह्यात स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती जर शेतकऱ्यांना असेल तर एकाच उत्पन्नावर अवलंबून न राहता इतर आपल्याला काय करता येईल याचा सुध्दा विचार शेतकऱ्यांना करता येईल. मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला आपण योजनांपर्यंत येण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, तर योजना त्यांच्या दारापर्यंत न्याव्या लागतात. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही यावेळी श्रीमती शेंडे म्हणाल्या.

             यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे या शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या यशस्वी आयोजन केल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तसेच लाभार्थ्यांचेही अभिनंदन केले, सर्वांनी या महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.ओम्बासे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले तर सूत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस.डी. कामत यांनी केले.


 
Top