न्याय आपल्या दारी योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाच्या विधी व सेवा प्राधीकरणाच्या वतीने गरीब व गरजूंंना मोफत कायदेशीर सहाय्य योजनेच्या माध्यमातून मोफत वकील पुरविण्यात येतो याचा लाभ गरजू नागरिकांनी घ्यावा असे आवाहन उस्मानाबाद येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री एन.एम.चिंतामणी यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ढोकी पोलीस ठाण्याच्या वतीने तेर ता.उस्मानाबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या कायदेविषयक माहिती शिबिरात न्या.चिंतामणी बोलत होते. प्रारंभी कार्यक्रमांचे प्रास्ताविक ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी केले.
यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी,ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नागनंदा मगरे , ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , बीट अमंलदार प्रकाश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्या नागरिकांचे उत्पन्न 3 लाखापर्यंत आहे अशा गरजूंना विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने मोफत वकील दिला जातो त्या वकिला मार्फत न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येतो अशी माहिती ही न्या.चिंतामणी यांनी दिली.यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुभाष कुलकर्णी , जि.वि.शाखेचे सुखदेव जाधव ,अधिपरिचारिका संगिता चव्हाण , अमोल थोडसरे केशव वाघमारे , विठ्ठल कोकरे , अंगणवाडी सेविका आशा स्वंयसेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .