उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 चालु वर्षात समाधानकारक पाऊसकाळ झाल्यामुळे धाराशिव व लातुर जिल्हयातील सर्व प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.  मांजरा, तेरणा, तावरजा, मसलगा व निम्न तेरणा धरणात ३३ टक्के पेक्षा जास्त जिवंत पाणीसाठा झाला असल्याकारणाने सर्व लघु प्रकल्प, साठवण तलाव, मध्यम प्रकल्प व बॅरेजमधुन रब्बी हंगामाकरीता शेतीला पाणी मिळणेकरीता १५ नोंव्हेंबर पर्यंत संबंधीत पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी करण्याचे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  केले आहे.

 सर्व लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना ७ व ७ अ सह  बिट प्रमुखाकडे सादर करावा.  तसेच संबंधीत अर्ज लाभक्षेत्राच्या ग्रामपंचायत कार्यालयात ७/१२ उताऱ्यासह सादर करावा.  सदर पाणी पुरवठा हा लाभक्षेत्रातील रब्बी हंगामाच्या पिकांकरीता १५ ऑक्टोबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत राहणार आहे.  पाणी  पुरवठा च्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकाचे नियोजन करावे.

 पाटबंधारे विभागात रिक्त पदांची संख्या विचारात घेता शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पाण्याची  मागणी संबंधीत कार्यालयाकडे रितसर अर्जासह करावी.  जेणेकरुन पाटबंधारे विभागास पुढील नियोजन करणे सोईस्कर होईल.

 
Top