उस्मानाबाद /प्रतिनिधी -

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या 23.66 टीएमसी पाण्याच्या रु.11,726 कोटी च्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. मार्च 2024 अखेरपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात कृष्णा खोऱ्याचे पाणी आणण्याचा संकल्प असून या प्रकल्पाच्या पांगरधरवाडी ता.तुळजापूर येथील पंपगृहाच्या कामास माजी गृहमंत्री व या प्रकल्पाचे प्रणेते डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांच्यासह आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

     


उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध करून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवून सर्वसामान्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावत मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्याचे 21 टीएमसी पाणी मंजूर करून घेतले होते.

मागील अनेक वर्षापासून या प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. बरेच दिवस काम बंदही होते. पावसाळी अधिवेशना दरम्यान प्रकल्पाची क्षमता 7 टीएमसी पर्यंत मर्यादीत न ठेवता या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची विनंती आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली होती. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन युती सरकारने हा विषय प्राधान्याने घेत प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे धाराशिवकरांचे अनेक दिवसाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नवीन कामाच्या भूमीपूजनासाठी प्रकल्पाला भेट देण्याची विनंती केली असून, त्यांनी ती मान्य केली आहे.

या योजनेंतर्गत पांगरधरवाडी ता.तुळजापूर येथील पंपगृहाच्या कामाची पाहणी करून माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांच्यासह आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अधिक्षक अभियंता श्री.शिंगाडे व कार्यकारी अभियंता श्री.घुगे यांनी चालू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. 

या संस्थेच्या सहाय्याने कालमर्यादा निश्चित करून घेऊन नियोजनबद्धरीत्या हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. मार्च 2024 पर्यंत प्रत्यक्षात पाणी तुळजापूर पर्यंत यावे या अनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक आठवड्यांच्या कामाचे ‘विकली प्लॅनिंग’ करून दर पंधरा दिवसाला आढावा घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मार्च 2024 अखेर जिल्ह्यात कृष्णा खोऱ्याचे पाणी आलेच पाहिजे यासाठीचे ठोस नियोजन केले असून युध्दपातळीवर काम सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचा शब्द आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उपस्थित अधिकारी व शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याच्या सुचना दिल्या.

डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांनी मोठ्या दूरदृष्टीने हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल व याचा शेतकऱ्यांना होत असलेला उपयोग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उपस्थित शेतकऱ्यांनी या प्रकल्पाबद्दल डॉ.पद्मसिंह पाटील साहेब व आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचा आदरपूर्वक सत्कार करून आभार व्यक्त केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, मा.जि.प.सदस्य राजकुमार पाटील, जिल्हा मजूर फेरड्रेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, यशवंत लोंढे, सरपंच बालाजी शिंदे, मा.सरपंच विजय निंबाळकर, बालाजी डोंगरे, शंकर कदम, सोमनाथ शिंदे, बापू साळुंके, शिवाजी गाटे, संतोष मते, बाळासाहेब गाटे, महेश सावंत गणेश गायकवाड यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 
Top