उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पहिले बील त्वरीत मिळावे, यासाठी शासनाने साखर कारखान्यांचे साखर विक्री परवाने रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी (दि.3) सकाळी 11.30 वाजता येडशी येथे राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल एकतास झालेल्या रास्तारोकामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अतिरिक्त झालेला ऊस जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे सन 2021-2022 जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पाठविला होता. ऊस पाठवून चार महिने होत आले. परंतू ऊस घेवून जाणार्‍या साखर कारखान्यांनी अद्यापपावेपर्यंत ऊस बिलाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे दिली नाही. तसेच जिल्ह्यामध्ये मागील पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यातच शेतकर्‍यांचे नगदी पीक असणार्‍या सोयाबीन पीकाचे मोठ्या प्रमाणात गोगलगाईनी खाऊन फस्त केले आहे. शेतकर्‍यासमोर मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी असल्यामुळे जिल्ह्यातील आठ शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचे पहिले बील एफआरपीप्रमाणे अद्यापे दिलेले नाही. अशा कानखान्यांचे साखर विक्री परवाने रद्द करुन त्यांचे साखर गोडावून ताब्यात घेवून त्याचा शासन स्तरावर लिलाव करावा. व शेतकर्‍यांचे थकीत ऊसबील शासनामार्फत त्वरीत वाटप करावे, यासाठी बुधवारी (दि.3) येडशी येथील राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते संजय निंबाळकर यांनी शेतकर्‍यांचा अंत पाहू नका, बील त्वरीत द्या, अन्यथा येत्या काळामध्ये याचा उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे. आंदोलनात आबासाहेब आडसुळ, प्रशांत फंड, अशोक पवार, प्रमोद वीर, अमर देशमुख, अमोल देशमुख, औदुंबर धोंगडे, श्री.गादेकर, नाना जमदाडे, धनंजय गुंड, दादाराव गुंड, अनंत पाटील, भरत गरड, सतिश शितोळे, बबलू कुंभार, लालासाहेब शितोळे, शरद सरवदे, राजकुमार राखुंडे, आप्पाराव माने, श्री.काळदाते, अभिमान आडसुळ, सुरेश समुद्रे, गोविंद पहाडे, अरुण पवार, हरिभाऊ माळकर, बळीराम गुंड, दत्तू वाघमारे, महेश गुंड, बापू लोमटे, हमिद शेख, प्रकाश गवार, बजरंग शिंदे, सचिन शेळके, दयानंद पाटील, लहू गोरे, दत्ता आसबे, महादेव गुणल, महेश पवार, सुनिल बोरकर, विलास आडसूळ, राजाभाऊ कवडे, चंद्रकांत पवार, दशरथ पवार, पोपट कवडे, अशोक पवार, भारत शिंदे, प्रकाश मुंदडा आदींची उपस्थिती होती.

आठ दिवसात बील न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार : दुधगावकर

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पहिले बील त्वरीत मिळावे, यासाठी शासनाने साखर कारखान्यांचे साखर विक्री परवाने रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. त्यामुळे येत्या आठ दिवसात बील न मिळाल्यास मुंबई, पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.


 
Top