उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या मात्र अद्याप केवायसी e-KYC (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत केवायसी ऑनलाईन करुन घ्यावी. e-KYC दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण केल्याशिवाय लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरीत होणार नाही याची गंभीर दखल शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने  केले आहे.

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम मे-2022 पर्यंत राबविण्यात आली. मात्र अद्यापही जिल्ह्यातील 38 टक्के लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅब मध्ये किंवा पीएम किसान ॲपमध्ये ओटीपीद्वारे लाभार्थींना स्वत: केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर केवायसी बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल, असे आवाहनही जिल्हा प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.


 
Top