उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे

 राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३० ऑगस्ट २०२२ हा आहे.

  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेचा तपशील व अर्जाचा नमुना maharashtra.gov.org या संकेतस्थळावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक 26 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयात व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल,  उत्कृष्ट मंडळाच्या निवडीसाठी पर्यावरण पूरक मूर्ती, पर्यावरण पूरक देखावे, स्वातंत्र्याच्या चळवळीशी संबंधित देखावे, ध्वनी प्रदूषण विरहित वातावरण, मंडळाचे सामाजिक कार्य, मंडळांनी घेतलेल्या पारंपरिक क्रीडा स्पर्धा  पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजनातील शिस्त असे इत्यादी निकष ठेवण्यात आले आहेत


 
Top