उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 31, 32(अ), 33, 33(अ), 46, 53(1अ) 53(अ) अंतर्गत मुद्रांक जिल्हाधिकारी उस्मानाबाद आणि अधिनस्त सह दुय्यम निबंधक वर्ग-2 उस्मानाबाद तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम, परंडा, वाशी आणि लोहारा यांच्या कार्यालयातील प्रलंबित प्रकरणातील कमी पडलेला मुद्रांक शुल्कावर आकारण्यात येणा-या शास्ती, दंडामध्ये शासनाने अभय योजना 2022 अंतर्गत सवलत जाहीर केली आहे. सक्षम अधिकारी यांनी दि. 31 मार्च 2022 पूर्वी ज्या प्रकरणात दंड वसूलीबाबत पक्षकारास किमान एक नोटीस बजावलेली आहे अशा सर्व प्रकरणांना ही सवलत लागू राहील.

 या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 01 एप्रिल 2022 ते दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत आहे. पूर्वी दाखल होणा-या प्रकरणांसाठी दंड रक्कमेच्या 90 टक्के सवलत आणि दि. 01 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 कालावधीत दाखल होणा-या प्रकरणांसाठी दंड रक्कमेच्या 50 टक्के  देण्यात येणार आहे. तसेच मूळ मुद्रांक शुल्क शासन जमा केल्यानंतर आकारल्या जाणा-या दंडामध्ये सवलत मिळेल, परंतु मुळ मुद्रांक शुल्कामध्ये कोणतीही सुट अथवा सवलत मिळणार नाही. तसेच अर्जदांराना अभय योजना 2022 आदेशातील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहील.

 त्यानुषंगाने  पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे क्र. का. 12/ दंड सवलत अभय योजना/461/2022, दि. 26 जूलै 2022 रोजीचे निर्देशान्वये दि. 30 जुलै 2022 आणि दि. 31 जुलै 2022 रोजी अनुक्रमे 5 वा शनिवार आणि रविवार असल्यामुळे या दिवशी थकीत मुद्रांक शुल्काच्या दंडातील असलेली सुट याचा जनतेस लाभ होण्यासाठी वरील दिवशी फक्त याच कामकाजाकरिता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद उघडे ठेवण्यात येत आहे.

 या योजनेअंतर्गत अर्जदारांनी  करावयाचा अर्जाचा नमूना मुद्रांक जिल्हाधिकारी  व सह दुय्यम वर्ग-2, दुय्यम निबंधक कार्यालय येथे तसेच विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत दि. 31 मार्च 2022 पूर्वी बजावण्यात आलेल्या नोटीसची प्रत सादर करणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. ध. ज. माईनकर यांनी केले आहे.


 
Top