उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील गालिबनगर, सुलतानपुरा, मिल्ली कॉलनीतील नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाच्या नाल्यावरचे अतिक्रमण पावसाळ्या पुर्वी काढावे व या वसाहतींमधील रस्ते, नालीसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे येथील नागरिक उस्मानाबाद नगर परिषदकडे घरपट्टी, नळपट्टी व इतर मालमत्ता कराचा भरणा करत असताना मूलभूत सुविधा देण्यास प्रशासन वारंवार पाठपुरावा करुन देखील चालढकल करत असल्यामुळे ही याचिका दाखल केली असल्याचे याचिकाकर्ते शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांनी सांगितले.