उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 दुधगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील समाज मंदिर उद्ध्वस्त करून त्याच्या साहित्याची विल्हेवाट लावणाऱ्या दोषींवर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या रवींद्र कसबे यांना गटविकास अधिकारी तायडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर कसबे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. 

 सन २००८ मध्ये दुधगाव येथील समाज मंदिर तत्कालीन गाव पुढाऱ्यांनी उध्वस्त करून त्याच्या साहित्याची आपापसात विल्हेवाट लावली याप्रकरणी सरपंच श्यामसुंदर पाटील आणि ग्रामसेवक शिंदे यांच्यावर कारवाई करावी अशी रवींद्र दादाराव कसबे यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.

  कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी गावामध्ये सभा मंडप उभारण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी दिलेला आहे या निधीतून तात्काळ काम सुरू करावे अशी ही मागणी रवींद्र कसबे यांनी केलेली आहे. समाज मंदिर उध्वस्त प्रकरणी प्रशासन स्तरावरून कोणतीही कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. 

 उस्मानाबादचे गटविकास अधिकारी तायडे यांनी उपोषणस्थळी कसबे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य कारवाई केली जाईल असे लेखी पत्र दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले या उपोषणामध्ये पांडुरंग कसबे,प्रदीप कसबे, महिपती कसबे,अंकुश पेठे, बहुजन रयतचे जिल्हाध्यक्ष अमोल पेठे, आरपीआय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष पोपट लांडगे यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवत प्रशासनाला न्याय देण्याची मागणी केली.


 
Top