उस्मानाबाद / प्रतिनिधी- मराठवाड्याच्या विकासासाठी जे शक्य आहे ते सर्व प्रयत्ने मी करीत आहे. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांच्या पाण्याचा प्रशन सोडवण्यासाठी राज्यशासन कटीबध्द आहे.तसेच मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णाखो-यातील 24 टीएमसी पाणी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यास मिळावे यासाठी मराठवाड्यातील सर्व आमदार आणि खासदारांचे एकमत आहे या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत, असे प्रतिपादन राज्याचे बांधकाम विकास मंत्री अशोक चव्हाण यांनी काल उमरगा येथे केले.

 भारत शिक्षण संस्थेच्या शिवाजी महाविद्यालयातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. शिवाजी महाविद्यालयात त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्याचे आणि शिवाजीराव दाजी मोरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच आठवणीतील दाजी या स्मृतिग्रंथाचे विमोचन आणि तात्याराव मोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे उद्घाटन तसेच शिवाजीराव दाजी मित्रमंडळातर्फे मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण श्री.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीचे खासदार संजय पाटील होते, तर खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री.विक्रम काळे, सतीश चव्हाण,अमर राजूरकर, ज्ञानराज चौगुले, संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार मधुकर चव्हाण,भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजी मोरे उपाध्यक्ष अश्लेश मोरे आणि गुरुबाबा महाराज औसेकर उपस्थित होते.

 1941 मध्ये तात्याराव मोरे यांनी भारत प्राथमिक शाळा सुरू केली होती. स्वातंत्र्यापूर्व काळात लावलेले हे रोप आज विशाल वटवृक्ष बनले आहेत. याचे श्रेय दिवंगत श्रीधर मोरे आणि शिवाजीराव मोरे यांना जाते. आता या वृक्षाला सांभाळण्याची जबाबदारी अमोल मोरे आणि अश्लेश मोरे यांची आहे.गरजू आणि शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना नेहमीच मोरे परिवाराने मदतीचा हात देऊन उच्च शिक्षण दिले आहे.भविष्यातही भारत शिक्षण संस्थेतून अनेक विद्यार्थी देशविदेशात आपल्या कारकीर्दीतून संस्थेचा नावलौकिक करतील अशी मला आशा आहे. असेही श्री.चव्हाण यावेळी म्हणाले.

 खासदार पाटील म्हणाले, मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे पालक म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते,त्यांनी येथील जनतेचे पालकत्व स्वीकारून मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे.कृष्णाखो-यातून मराठवाड्याला केंद्राकडून बजट मिळावे यासाठी मी प्रयत्न करेन असेही ते यावेळी म्हणाले.

 यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां डॉक्टरांचा सन्मानही करण्यात आला.तसेच आत्महत्या ग्रस्त यांच्या परिवारातील वारसांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

 तत्पूर्वी ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार,विक्रम काळे, संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी आमदार मधुकर चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

 
Top