उस्मानाबाद / प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे राणादादा यांचा पॕनलचा दारूण परभाव झाला आहे. महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. अखेरच्या टप्प्यात चुरस वाढल्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. मात्र महाविकास आघाडीच्या एकोप्याने भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपला एकही जागा मिळाली नसून काही ठिकाणी उमेदवारच न मिळाल्याने यापूर्वीच महाविकास आघाडीच्या जागा बिनविरोध निघाल्या होत्या. गेली महिनाभर गाजलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचा निकाल सोमवार दि.21फेब्रवारी रोजी जाहीर झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या टप्प्यात कळंब येथील विकास सोसायटी मतदारसंघाचा कल शिवसेनेच्या बाजूने लागला.
बळवंत तांबारे यांनी ४० मते घेत आघाडी घेतली. याच जागेसाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागली होती. भाजपचे यंग ब्रिगेड मैदानात उतरल्याने चुरस वाढली होती. अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी निवडणुकीचा ताबा घेऊन मतदारापर्यंत पोहोचले. त्यामुळे रंगत वाढली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीने एकोपा दाखविल्याने भाजपची दाळ शिजली नाही. काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या तुरळक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याची अप्रत्यक्ष हाक मतदारांनी ऐकली नाही. आणि कळंब तालुक्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाला. या शिवाय उस्मानाबाद विकास सोसायटी मतदारसंघातून नानासाहेब पाटील मोठ्या मताधिक्याने विजय झाले. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल २२ मतांनी पराभव केला आहे. इतरही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भाजपला भोपळाही फोडता आला नाही.