उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सत्तेतील तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन भाजपा विरोधात लढावं लागलं, यातच सर्व काही आलं. दोन माजी मंत्री,एक खासदार, तीन आमदार,दोन माजी आमदार हे सर्व सत्ताधारी पक्षातील एकत्रित येऊन लढले. काही अपप्रवृत्तीच्या हातात कारभार जाऊ नये, बँकेची सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा तेरणा कारखान्या सारखी होऊ नये, यासाठी निवडणूक लढविली, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

लोकशाहीमध्ये मतदार सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो. पराभवाची कारणमीमांसा व निकालाचे आत्मचिंतन करू. राज्यात सत्तेत असतानाही मागील दोन वर्षांपासून थकहमीचे पैसे यांना आणता आले नाहीत. बँकेला एक रुपयाचीही मदत सरकारकडून आणू शकले नाहीत. निदान आता तरी थक हमीचे पैसे आणतील अशी आशा करतो.  नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन. बँक पूर्वपदावर आणण्यासाठी आमच्या संचालक मंडळाने सुरू केलेले प्रयत्न ते सुरू ठेवतील, या अपेक्षेसह शुभेच्छा देऊन सर्व मतदारांचे आभार आमदार राणापाटील यांनी मानले.

बिनविरोधचा आग्रह-नितीन काळे

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेची आिर्थक स्थिती चांगली नसल्यामुळेच पंचवार्षीक संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध व्हावी, यामुळेच आम्ही प्रयत्न करत होतो. परंतू सत्ताधाऱ्यांनी सत्ता व धनशक्तीच जोरावर ही निवडणुक जिंकली. 

जिल्हयाच्या विकासासाठी -नेताजी पाटील

आमदार राणाजगजितसिंह पाटील हे केवळ उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. विरोधकांनी एका पराभवामुळेच भाजपावाशी झाल्याचा आरोप केला आहे. येत्या जि.प.पं.स निवडणुकीत आम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाऊ, असे नितीन काळे व नेताजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस दत्ता कुलकर्णी, अॅड.खंडेराव चौरे उपस्थित होते. 

  

 
Top