उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कौडगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली. दोन टप्प्यांचे भूसंपादन देखील पूर्ण झाले. ५० मे.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर होऊन कामही सुरू झाले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे सदरील काम रेंगाळल्याचा आरोप करत राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी, यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांनी ग्रामदैवत हनुमानजींची महाआरती करून साकडे घातले.

या वेळी बोलताना आ. राणाजगजिसिंह पाटील म्हणाले की, कौडगाव एमआयडीसीमध्ये १५०० एकर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून बार्शी तालुक्यातील १००० एकरचे भूसंपादन अंतिम टप्यात आहे. उच्चदाब वीज वाहिनी, गॅस पाईपलाईन, पाणी या पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी येथील गरज लक्षात घेऊन आपल्या मागणीप्रमाणे या भागातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्निकल टेक्स्टाइल उभारण्यास मान्यता दिली व एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या. परंतु सन २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रस्तावावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. आजवर सदरील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केला, भेटून विनंती केली, अधिवेशनामध्ये सातत्याने हा विषय मांडला मात्र ना याबाबत बैठक बोलावली जाते. ना ही काही निर्णय घेतला जातो. उद्योग मंत्री यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या विषयात लक्ष घालून बैठक बोलावण्याची मागणी केली, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडूनही काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

या विषयाबाबत येत्या १५ दिवसाच्या आत बैठक घेऊन राज्य सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा मारुती रायाचे दुसरे नाव बलभीम आहे याची प्रचिती जनता देईल, असा सज्जड इशारा याप्रसंगी देण्यात आला.

या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, अँड. खंडेराव चौरे, नितीन भोसले, अभय इंगळे, राजसिंहा राजेनिंबाळकर, युवराज नळे, बालाजी सुतार,‍ राजाभाऊ थोरात, नितीन थोरात, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 
Top