उस्मानाबाद / प्रतिनिधी-

औरंगाबाद विभागात जगप्रसिध्द पुरातन स्थळे आहेत. अनेक ऐतिहासिक पुरातन स्थळे देखील आहेत. पुरातत्व विभागाच्या यादीत नोंद नसलेली परंतु दुर्लक्षित स्वरुपात असलेली आणि ऐतिहासिक घटनाचे साक्षीदार असलेली स्थळ इत्यादी अस्तित्वात आहेत. ऐतिहासिक वारस असलेल्या अशा दुर्लक्षित स्थळांचे जतन आणि संवर्धन न केल्यास ही स्थळे काळाच्या ओघात नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या ऐतिहासिक वारसाचे जतन केल्यास हा अमूल्य ठेवा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच या स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास पर्यटन वृध्दी आणि त्याअनुषंगाने रोजगार निर्मितीस देखील चालना मिळेल. यास्तव औरंगाबाद विभागातील सर्व ऐतिहासिक पुरातन स्थानांचे सर्वेक्षण करुन त्याचे दस्तऐवजीकरण करणे, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास करुन पर्यटन वृध्दी करणे यासाठी विभागात उपक्रम राबविण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे.

यास्तव वरील उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील पुरातन स्थळे जसे की, स्मारक,शिलालेख, शिल्प, बारव,समाधी, ऐतिहासिक घटना घडलेले स्थळ इत्यादीचे सर्वेक्षण करण्यासाठी इतिहास संशोधक, इतिहास अध्यापक आणि पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी आणि पर्यटन विभागाचे प्रतिनिधी इत्यादींचा समावेश करुन जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभ्यास गटात अपर जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर सदस्य म्हणून सहाय्यक अभिरक्षक,पुरातत्व तेर, औरंगाबादचे उपसंचालक पर्यटन, जिल्ह्यातील इतिहास तज्ज्ञ केतन पुरी, सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 
Top